उज्ज्वला साळुंके
औरंगाबाद : शाळा, महाविद्यालयांकडे ज्ञानाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. मात्र त्यात आता पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्येच वाद निर्माण होताना दिसत आहे. शहरातील एका शाळेत एका पालकाने मुख्याध्यापिका, सहशिक्षिकेला मारहाण केल्याची खळबळजनक घटनासमोर आली आहे. यामुळे सर्वत्र शिक्षकवर्गाकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. तसेच याआधीदेखील अशा घटना समोर आल्या असल्याने शिक्षणक्षेत्रात चाललंय तरी काय? असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहे.
पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून देतात आणि आपली जबाबदारी संपली असे काही पालक समजातात. याउलट काही शिक्षकवर्गही विद्यार्थ्यांना कडक कारवाई करतात. त्याचाच राग विद्यार्थीही डोक्यात ठेवून बसतात. याचा परिणाम मारहाणीत होत आहे. पालकांनी आपल्या पाल्याला घडविण्यामध्ये ज्या शिक्षकांचे योगदान आहे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. नुकत्याच झालेल्या घटनेमुळे पालकांनी मुख्याध्यापकांना समजून घेतले असते तर अशी घटना घडली नसती. यामुळे शिक्षण क्षेत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसत आहे.
पालकांनी समजून घेतले पाहिजे
पाल्यांना ज्ञानदानाचे काम करणार्या शिक्षकांना समजून घ्यायचे सोडून त्यांच्यावर हात उगारणे कितपत योग्य आहे? असाही प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. पालकांनी शिक्षकांना समजून घेतले पाहिजे. अनेकदा पालक अरेरावीची भाषा करताना शिक्षकांना समजून घेण्याऐवजी त्यांनाच दमदाटी करताना दिसतात. याआधीदेखील शिक्षकांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याला आळा बसण्यासाठी पालकांनी शिक्षकांना समजून घ्यावे आणि शिक्षकांनीही पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत. तरच अशा मारहाणीच्या घटनांना आळा बसेल. याशिवाय एकीकडे मुलांना शाळेत शिस्त लावा, असे पालकांकडूनच शिक्षकांना सांगण्यात येते. मात्र दुसरीकडे प्रत्यक्षात अभ्यास का केला नाही? असा प्रश्न विचारला तरी पालक शिक्षकांनाच भांडण्यासाठी येतात. यामुळे काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यास केला नसला तरी रागवणे बंद केले आहे. यात मात्र नुकसान कुणाचे होणार? याचाही आता विचार करावा लागणार आहे. शिक्षकांनीही अमानुषपणे विद्यार्थ्यांना शिक्षा न करता त्यांना समजून घेतले पाहिजे. तरच अशा मारहाणीच्या घटनांना आळा बसेल, असेही सर्वत्र बोलले जात आहे.